उंबरखिंड

India / Maharashtra / Khopoli / SH 92-Khopoli Pali Road
 historic landmark (en)  गट निवडा

सह्याद्री जणू एक चक्रव्यूह आहे. इथं नुसती आत जाणारी वाट जाणून चालत नाही, तर बाहेर पडण्याचे मार्गही माहीत असावे लागतात. मराठी वाघांनी याच चक्रव्यूहात पकडून शत्रूला अनेकदा पाणी पाजलंय. त्यातलंच एक बडं नाव म्हणजे कारतलबखान. पुणे मुक्कामी राहिलेल्या शाहिस्तेखानाचा हा सरदार. सुमारे तीस हजारची फौज घेऊन कोकण काबीज करायला निघाला. देशावरून कोकणात उतरण्यासाठी त्यानं वाट धरली, ती उंबरखिंडीची आणि बरोबर त्याच खिंडीत त्याला गाठून दस्तुरखुद्द महाराजांनी आणि नेताजी पालकरांनी अवघ्या मूठभर (साधारण हजारभर) सैन्यानिशी त्याचा सपशेल पराभव केला.

या उंबरखिंडीची यात्रा करायचा मनसुबा कित्येक दिवस मनात घोळत होता. त्यासाठी माझ्यासह श्रीपाद थेटे, मिलिंद मोने, जयेश धडफळे असे चौघेजण पहाटे साडेसहाची लोकल पकडून लोणावळ्यात आलो.

लोणावळ्यापासून चार किलोमीटवर कुरवंडे गाव आहे. तिथूनच इंद्रायणी नदीचा उगम आहे. प्रसिद्ध नागफणी उर्फ ड्यूक्स नोजवरही इथून जाता येतं. कुरवंडे गावी जाण्यासाठी लोणावळ्यातून सुमो वगैरे गाड्या मिळतात. चालत जायचं असल्यास भुशी डॅमकडे जाणारा रस्ता पकडावा. तिथे डावीकडे वळण्याएवजी सरळ जावं. टाटा डॅमची भिंत ओलांडून आपण पुन्हा डांबरी रस्त्याला लागतो. पाऊण-एक तासात आपण कुरवंडे इथं पोहचतो आणि खरा ट्रेक चालू होतो. आयएनएस शिवाजी संस्थेची भिंत डावीकडे ठेवत आपण एक टेकाड चढून जातो ते नागफणीकडे. आता नागफणी उजवीकडे दिसते. तिथं जाऊन येण्यास एक तास पुरतो; पण पुढची वाट आणि अंतर बरंच असल्यानं आम्ही डावीकडं वळून खाली उतरायला सुरुवात केली. इथून खाली सुंदर दृश्य दिसतं. पायथ्याशी चावणी गाव, अंबा नदी, कोकणातून येणारे पावसाळी ढग आणि त्यात डोकं घुसळणारा नागफणीचा कडा, असा अाल्हाददायक अनुभव येतो.

येथून जीएआयएल या कंपनीची पाइपलाइन जाते आणि आपल्याला तोच रस्ता पकडायचा असतो. थोडा सिमेंटचा, थोडा मातीचा असा अर्धवट बांधलेला रस्ता न सोडता आपण सह्याद्रीचा पहाड उतरू लागतो. वाट तीव्र उताराची आहे आणि उखडलेल्या दगडांनी ती अजूनच अवघड केली आहे. आजूबाजूला नयनरम्य धबधबे कोसळताना दिसतात.

एक तासाच्या घसरगुंडीनंतर आपण मातीच्या पायवाटेवर पोचतो. आता हवेत चांगलीच आर्द्रता जाणवते. शेतांच्या बांधावरून जाताना वाटेत एक ओढा आपण पार करतो. ट्रेकमधील हा पाण्याचा पहिला स्त्रोत. पाऊसकाळात हा दुथडी भरून वाहात असतो, इतका की पार करणंही अवघड होऊन बसतं.

हिरव्या गालिच्यामधून जाणाऱ्या पायवाटेनं आपण पुन्हा एका प्रवाहापाशी पोहचतो. हीच ती अंबा नदी. मघाचा ओढा येथे नदीला येऊन मिळतो. इथे प्रवाहाचा वेग जोरात आहे. लोणावळ्यातून निघून आता अडीच तास झालेले असल्यानं इथं एखादा ब्रेक घेता येतो.

ओढा ओलांडून, चावणी गावातून आपण पुन्हा डांबरी सडकेला येऊन मिळतो. आता अंबा नदीच्या पात्राच्या बाजूनं जाणारा रस्ता तुडवायचा असतो. थोड्याच वेळात आपल्याला पलीकडे एक मंदिर दिसतं. तिथे नदीपात्रात रांजणखळगे आहेत. तिथून अर्ध्या तासानं आपण अरुंद रस्त्याला लागतो. दोन्ही बाजूनं सह्याद्रीचे डोंगर जवळ येताहेत, नदीचं पात्र थोडं खाली गेलं आहे, अशावेळी अनपेक्षित आपल्याला उंबरखिंडीचा फलक दिसतो. झाडीत नीट पाहिल्यावर स्मारक दिसतं आणि ट्रेकची इतिकर्तव्यता जाणवते.

हीच ती जागा जिथं कारतलबखानास त्राही भगवान करून सोडलं. आजही हिची दुर्गमता, महाराजांनी केलेली जागेची अचूक निवड याची महती पटते. महाराजांनी भूगोलाचा केलेला अचूक वापर, गनिमीकावा म्हणजे काय असं सारं इथं उलगडतं. लोणावळ्याच्या शिवदुर्गमित्र संस्थेनं इथं छान स्मारक उभारलं आहे. स्मारकाच्या दर्शनानं कृतकृत्य होऊन आपण निघतो. अजून चार किलोमीटरची पायपीट बाकी असते. धबाबा कोसळणारे धबधबे आणि हिरवीगार वनश्री साथ देत राहते. शेंबडी हे खोपोली-पाली मार्गावरचं छोटंसं गाव आहे. इथून खोपोलीपर्यंत एसटी आणि सहा आसनी रिक्षा मिळतात.

खोपोलीहून पुण्यास येणारी गाडी पकडावी किंवा लोणावळ्यात येऊन पुन्हा लोकल घ्यावी. लोकलमध्ये इतर लोक राजमाची, लोहगड-विसापूरच्या ट्रेकबद्दल बोलत असतात. आपण मात्र उंबरखिंडीच्या ट्रेकमध्ये धुंद असतो. सहा-साडेसहा तासांची पायपीट एक अविस्मरणीय यात्रा घडवून जाते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°43'6"N   73°19'14"E
  •  46 किमी.
  •  63 किमी.
  •  155 किमी.
  •  290 किमी.
  •  515 किमी.
  •  534 किमी.
  •  750 किमी.
  •  786 किमी.
  •  858 किमी.
  •  927 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी